पिढ्यानपिढ्या कसत असलेली वनजमीन अद्याप आदिवासींच्या नावे न झाल्यामुळे आता आदिवासींचा रोष उफाळून आला आहे. हजारो वनहक्क दावे वनविभागाकडे प्रलंबित असूनही न्याय मिळत नसल्यानं लाल बावटा माक्सवादी-लेनिनवादी पक्षाने २५ जूनपासून बेमुदत बिऱ्हाड आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे.
२००५ मध्ये मंजूर झालेल्या वनाधिकार कायद्यानंतर दोन दशके उलटली असली तरीही आदिवासींना त्यांच्या हक्काच्या जमिनीवर मालकी मिळालेली नाही. काहींना मिळालेले वनपट्टे केवळ १ ते २ गुंठ्यांपुरतेच मर्यादित आहेत, असा आरोप पक्षाने केला आहे.
यामध्ये वनविभागाकडून जाणीवपूर्वक अडथळे आणले जात असल्याचा गंभीर आरोप पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे.
“वनहक्काचा कायदा आम्ही रस्त्यावर लढून मिळवला, पण आता अंमलबजावणीसाठीही आम्हालाच संघर्ष करावा लागत आहे,” असे वक्तव्य लाल बावटा पक्षाचे जिल्हा सहसचिव काॅ. शेरू वाघ यांनी केले.या आंदोलनाची सुरुवात बुधवार, २५ जून रोजी सकाळी ११ वाजता बोईसर एसटी डेपो येथून मोठ्या रॅलीच्या माध्यमातून होणार असून, वनक्षेत्रपाल कार्यालयावर चाल करून बेमुदत बिऱ्हाड आंदोलन छेडण्यात येणार आहे.
पक्षाने सर्व नागरिक, आदिवासी शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांना या संघर्षात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
