मोखाडा तालुक्यातील गोमघर येथे आज दिनांक ४ एप्रिल २०२५ रोजी दुपारी सुमारे ३:३० च्या सुमारास अवकाळी पाऊस आणि जोरदार गारपीट झाली. या नैसर्गिक आपत्तीत आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून बागायतदार शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.यासोबतच, गावातील अनेक घरांवरचा पत्रा व कवळे उडून गेले आहेत . अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धांदल उडाली. शेतकऱ्यांचे सुमारे हंगामभराचे श्रम वाया गेल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
स्थानिक प्रशासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. शासनाने तातडीने दखल घेऊन बाधित शेतकरी व ग्रामस्थांना मदतीचा हात द्यावा, अशी जोरदार मागणी होत आहे.
कोट :
“माझ्या शेतात आंबा लागवड आहे आणि यावर्षी वाडीतील आंब्याचे खूप मोठे नुकसान झाले आहे. दरवर्षी या आंब्याच्या विक्रीतून आमच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळतो. मी वेळोवेळी ई-पिक पाहणीही केली होती. मात्र, अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे संपूर्ण उत्पादन बर्बाद झाले आहे. शासनाने नुकसानभरपाई द्यावी, हीच आमची मागणी आहे.”
विनोद ठोमरे, शेतकरी, गोमघर

