दृष्टी न्यूज सुधीर घाटाळ–
डहाणू, कासा : पालघर जिल्ह्यातील उधवा गावात तीन पेसा गाव मिळून आयोजित करण्यात आलेला सार्वजनिक सामूहिक लग्न समारंभ आदिवासी परंपरेनुसार अत्यंत उत्साही व अनुशासित वातावरणात पार पडला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार कॉ.विनोद निकोले उपस्थित होते.
ग्रामपंचायत सरपंच निर्मला फरले व ग्रामसेवक नैनेश तांडेल यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे व्यवस्थापन सुरळीतपणे पार पाडत एक सामाजिक उपक्रम यशस्वी केला. स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने नवविवाहित जोडप्यांना मंगलमय आशीर्वाद देण्यात आले.
या प्रसंगी आमदार निकोले यांनी आपल्या भाषणात गावकऱ्यांच्या एकोप्याचे व ग्रामपंचायतीच्या कार्यक्षमतेचे कौतुक केले. “अशा उपक्रमांमुळे गावात बंधुभाव वाढून सामाजिक सलोखा बळकट होतो,” असे सांगून त्यांनी भविष्यात गावाच्या सर्वांगीण विकासासाठी संपूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले.

विशेष म्हणजे, आमदार स्वतः मंडपात उपस्थित राहून वधू-वरांवर अक्षता टाकत आशीर्वाद दिले. ग्रामपंचायतीमार्फत नवदांपत्यांना संसार उपयोगी हंडा कळशी व इतर भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या. उधवा गावच्या डॉक्टर असोसिएशनतर्फे प्रत्येक जोडप्याला हंडा कळशी भेट देण्यात आली. ग्रामपंचायत उपसरपंच अशोक दांडेकर यांनी प्रत्येकी एक साडी, तर जिल्हा परिषद सदस्य अक्षय दवनेकर यांनी प्रत्येक जोडप्याला एक घड्याळ भेट दिले.

या कार्यक्रमासाठी मुख्य आरोग्य केंद्राची टीम देखील हजर होती. पारंपरिक व सांस्कृतिक वातावरणात पार पडलेल्या या सामूहिक लग्न सोहळ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
