प्रतिनिधी शैलेश तांबडा
७ कलमी कार्यक्रमात प्रथम क्रमांक
पालघर : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून संपूर्ण राज्यभर राबविण्यात आलेल्या १०० दिवसांच्या ७ कलमी कार्यक्रमात पालघर पोलीस दलाने उल्लेखनीय यश संपादन करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. भारतीय गुणवत्ता परिषदेकडून करण्यात आलेल्या मूल्यांकनात पालघर पोलीस दलास १०० पैकी ९०.२९ गुण मिळाले आहेत.या कार्यक्रमांतर्गत १) वेबसाईट सुधारणा, २) सुकर जीवनमान, ३) स्वच्छता, ४) तक्रार निवारण, ५) कार्यालयीन सुविधा, ६) गुंतवणुकीस प्रोत्साहन, आणि ७) क्षेत्रीय कार्यालयांना भेटी या सात विषयांवर जिल्हा पोलीस दलांनी कामगिरी करणे अपेक्षित होते.

पालघर पोलीस दलाने या प्रत्येक घटकात उल्लेखनीय उपक्रम राबविले. User-Friendly वेबसाईट, Chat Box व AI आधारित Chat Bot सुविधा, सायबर सुरक्षित पालघर मोहिम, स्वच्छता मोहीम, तक्रार निवारण दिन, ई-ऑफिस प्रणाली, Visitor Management System, कार्यालयीन कामकाजात AI तंत्रज्ञानाचा वापर आणि पेट्रोलिंगसाठी ‘Third Eye’ अॅप्लिकेशन यांसारख्या नवकल्पनांची अंमलबजावणी करण्यात आली.या यशामध्ये पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांचे मार्गदर्शन, तसेच सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाणे प्रभारी, अंमलदार व पोलीस अधीक्षक कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समन्वय आणि अथक परिश्रम निर्णायक ठरले.

विशेष म्हणजे, याआधी झालेल्या ५० दिवसांच्या मुल्यमापनामध्ये देखील पालघर पोलीस दलाने प्रथम क्रमांक मिळवला होता. या यशस्वी कामगिरीने पालघर जिल्ह्याचे नाव पुन्हा एकदा राज्यपातळीवर उज्वल केले आहे.
