दृष्टी न्यूज प्रतिनिधी शैलेश तांबडा
ठाणे:२ मे २०२५ ठाणे मध्यवर्ती कारागृह येथे क्रांतीवीर राघोजी रामजी भांगरे यांच्या १७७ व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, नवी दिल्ली (मुंबई/कोकण विभाग) महाराष्ट्र शाखेच्या वतीने हा कार्यक्रम पार पडला.
या प्रसंगी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, पालघरचे खासदार डॉ. हेमंत विष्णु सवरा, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार वैभव पिचड, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

राघोजी भांगरे हे ब्रिटीश सत्तेविरोधात सशस्त्र उठाव करणारे महाराष्ट्रातील आद्य स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्र व कोकणात ब्रिटिशांविरोधात अनेक चळवळी झाल्या. २ मे १८४८ रोजी त्यांना ठाणे कारागृहात फाशी देण्यात आली होती. त्यांच्या बलिदानाचे स्मरण करत उपस्थितांनी वधस्तंभाला अभिवादन केले.

या कार्यक्रमात खासदार डॉ. सवरा यांनी “राघोजी भांगरे यांचा इतिहास अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात यावा,” अशी मागणी केली. डॉ. सुनील पराड यांनी ठाणे कारागृहास राघोजी भांगरे यांचे नाव देण्याची आणि कारागृहा समोरील चौकात त्यांचा पुतळा उभारण्याची विनंती केली.

यावर आदिवासी विकास मंत्री डॉ. उईके यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, या मागण्यांवर लवकरच कृती होईल, असे आश्वासन दिले. तसेच काही योजनांना राघोजी भांगरे यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रम उत्साहात पार पडला आणि क्रांतीवीरांच्या स्मृतींना अभिवादन करत, त्यांच्या कार्याला नवा सन्मान देण्याचा संकल्प करण्यात आला.
