सुधीर घाटाळ
पालघर जिल्ह्यात विविध पायाभूत प्रकल्पांच्या कामांना वेग मिळत असताना, कासा-सायवन-उधवा-संजान राज्य मार्गाच्या सुधारणेच्या कामालाही काही दिवसांपूर्वी सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या माध्यमातून या महत्त्वपूर्ण प्रकल्पाची अंमलबजावणी केली जात आहे.
सध्या कासा, सायवन, कळमदेवी आणि उधवा परिसरातील रस्त्यांची अत्यंत खराब अवस्था आहे. अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे असल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. हा मार्ग मुंबई-ठाणे-नाशिक तसेच सिल्वासा, खानवेल आणि गुजरातकडे जाणाऱ्या वाहनांसाठी महत्त्वाचा पर्याय ठरतो.या मार्गाच्या रुंदीकरणानंतर दहा मीटर रुंद सिमेंट काँक्रीट रस्त्यात त्याचे रूपांतर होणार आहे. चार पदरी रस्ता झाल्याने प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी होईल. सध्या कासा, वाघाडी, धरमपूर आणि सायवन परिसरात झाडतोड व जमिनीचे सपाटीकरण सुरू आहे.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्याने अपघात आणि वाहतूक कोंडीच्या समस्या वारंवार उद्भवतात. मात्र, कासा-सायवन-संजान मार्गाच्या रुंदीकरणामुळे हा मार्ग सुरक्षित होईल आणि अपघातांचे प्रमाण कमी होईल, असे स्थानिक नागरिकांचे मत आहे.या मार्गाने ग्रामीण भागातील अनेक गावांना जोडले जाणार असून, वाघाडी येथील भीम बांध, वाघाडी जागृत हनुमान मंदिर, गंभीरगड आणि पुढे केंद्रशासित खानवेल, दमण, वापीपर्यंत सहज पोहोचता येईल. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या पर्यटकांनाही मोठा फायदा होणार आहे.
कोट-
कासा, सायवन आणि उधवा या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने अपघात होत असतात. दुचाकीस्वार आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. मात्र, आता हा मार्ग चार पदरी होणार असल्याने प्रवास सुखकर होणार आहे.
प्रशांत सातवी, सरपंच, ग्रामपंचायत वाघाडी
