भरत पुंजारा- प्रतिनिधी पालघर
डहाणू तालुक्यातील धाकटी डहाणू येथील मच्छीमार हनुमान गोविंद मर्दे (५२) खोल समुद्रात मासेमारी करत असताना प्रकृती खालावल्यानंतर भारतीय तटरक्षक दलाच्या तत्परतेमुळे जीवदान मिळाले. तटरक्षक दलाच्या वेगवान कारवाईमुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करून उपचार देण्यात आले. सुदैवाने, उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाली असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
२५ मार्च रोजी ‘लोचिता’ ही मासेमारी नौका डहाणू पासून सुमारे २५ नॉटिकल मैल खोल समुद्रात मासेमारी करत असताना हनुमान मर्दे यांना अचानक छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. त्रास वाढत असल्याने त्यांनी मोबाईलद्वारे कुटुंबीयांशी संपर्क साधून मदतीची मागणी केली. त्यांच्या मुलीने, भक्ती हिने प्रसंगावधान राखत सागरी पोलिसांच्या गस्तीनौकेकडे मदतीची विनंती केली, परंतु नौकेला बिघाड झाल्यामुळे मदत मिळू शकली नाही.या परिस्थितीत पोलिस कर्मचारी बिपिन मांगेला यांनी भारतीय तटरक्षक दलाच्या डहाणू कार्यालयाशी तातडीने संपर्क साधला. सकाळी १०:०५ वाजता भारतीय तटरक्षक दलाला मदतीचा संदेश मिळताच, कमांडर जितू आय. जोस यांच्या मार्गदर्शनाखाली ‘आय.सी. ११७’ ही गस्तीनौका तत्काळ मदतीसाठी पाठवण्यात आली. जीपीएस यंत्रणेद्वारे ‘लोचिता’ नौकेचा शोध घेऊन सकाळी ११:१५ वाजता मच्छीमार हनुमान मर्दे यांना सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणण्यात आले.
त्यानंतर अवघ्या १५ मिनिटांत त्यांना डहाणू उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे तातडीने उपचार मिळाल्यामुळे त्यांचा जीव वाचविण्यात यश आले.ही घटना दाखवते की मासेमारी व्यवसायात आधुनिक संपर्क तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर वाढत असून मच्छीमार त्याला सरावले आहेत. तसेच, डहाणू तालुक्यात भारतीय तटरक्षक दलाचे केंद्र स्थापन झाल्यामुळे मच्छीमारांना जलद आणि प्रभावी मदत मिळत आहे.
मात्र, सागरी पोलिसांच्या गस्तीनौका अद्ययावत आणि कार्यक्षम असण्याची गरज अधोरेखित झाली आहे. याशिवाय, समुद्रात अपघात किंवा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने मदत मिळण्यासाठी अत्याधुनिक सागरी रुग्णवाहिका पालघर जिल्ह्यासाठी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
