सुधीर घाटाळ
डहाणू तालुक्यातील रायतळी/चांदवड येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागांतर्गत प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना (पाणलोट विकास घटक 2.0) अंतर्गत वॉटरशेड यात्रेचे आयोजन करण्यात आले. या यात्रेचा मुख्य उद्देश लोकसहभागातून मृद व जलसंधारणाबाबत जनजागृती करून शाश्वत कृषी विकासाला चालना देणे हा होता.
यात्रेदरम्यान गावकऱ्यांना मृद व जलसंधारणाचे महत्त्व पटवून देण्यात आले. शेतीसाठी जलसंधारण किती गरजेचे आहे, शेततळ्यांची आवश्यकता आणि त्याचा शेतीतील उपयोग यावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमानंतर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या शेतावर भेट देऊन शेततळ्यांची पाहणी केली तसेच आवश्यक सूचना दिल्या.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायत रायतळीचे सरपंच जितेंद्र दळवी, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण धांगडा आणि चंद्रकांत करमोडा यांनी मोलाचे सहकार्य केले. जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी देखील या यात्रेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. तसेच ग्रामपंचायत रायतळी येथे कार्यरत असलेल्या ग्रामसेविका प्रीती बामणे यांनी विशेष सहकार्य केले. याशिवाय रायतळी बचत गटातील महिला सदस्य मनिषा देवनाथ, कलू डोल्हारी, मंजुळा सवरा, मनिषा भावर यांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महत्त्वाची भूमिका बजावली.

या यात्रेमुळे शेतकऱ्यांमध्ये जलसंधारणाबाबत जागरूकता निर्माण होऊन शेतीच्या उत्पादनात वाढ होईल, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे. तालुका कृषी अधिकारी अनिल नरगुलवार, कृषि विभागाचे मंडळ कृषि अधिकारी उमेश पवार, जगदीश पाटील, तसेच कृषि पर्यवेक्षक व कृषि सहाय्यक अंकिता पाटील,सचिन कामडी, सचिन नाठे, रेजिना राबड यांनी देखील या उपक्रमात सहभाग घेतला.

