वसई तालुक्यातील ग्रामीण भागातील महिलांनी एकत्र येत ‘घरकुल मार्ट’ सुरू करून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल केली आहे. दुर्गम भाग असलेल्या भालीवली येथे सुरू झालेल्या या मार्टमुळे घरकुल लाभार्थ्यांना दर्जेदार घरबांधणी साहित्य वाजवी दरात उपलब्ध होणार आहे. बुधवारी झालेल्या या मार्टच्या उद्घाटनप्रसंगी तालुका गट विकास अधिकारी प्रदीप डोलारे, ज्योतिर्मय पाटील (विस्तार अधिकारी, सांख्यिकी, घरकुल विभाग), सरपंच दिनेश परेड, उपसरपंच पूर्वा कुडू, ग्रामविकास अधिकारी संजय किणी, तसेच यशश्री महिला फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या अध्यक्षा नीता माळवी, माऊली प्रभाग संघ भाताणेच्या अध्यक्षा नीता घरत, उमेदच्या व्यवस्थापक सुप्रिया लोके, नीलिमा तरे यांच्यासह अनेक मान्यवर आणि महिलांनी उपस्थिती दर्शवली.
गट विकास अधिकारी प्रदीप डोलारे यांनी महिलांच्या या धाडसी उपक्रमाचे कौतुक करत पंचायत समितीच्या वतीने संपूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. तसेच वसईतील मंजूर घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांना ‘घरकुल मार्ट’मधून साहित्य खरेदी करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच, महिलांनी घरकुल साहित्याच्या व्यवसायासोबतच आपल्या भागातील रब्बी हंगामातील कडधान्ये आणि स्थानिक पिके विक्रीस उपलब्ध करून दिल्यास त्यांना मोठा फायदा होईल, असेही त्यांनी सुचवले.विस्तार अधिकारी ज्योतिर्मय पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, वसई तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजना, जनजाती आदिवासी न्याय महाअभियान, शबरी आवास योजना, मोदी आवास योजना आणि रमाई आवास योजना अंतर्गत २०२४-२५ साठी एकूण १२६० घरकुले मंजूर झाली आहेत.
त्यानुसार प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांची संख्या ११३१, प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान १२५ तर रमाई आवास योजनेचे ४ लाभार्थी असल्याचे सांगितले.महिलांनी सुरू केलेला ‘घरकुल मार्ट’ हा ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना देणारा स्तुत्य उपक्रम ठरणार आहे.
घरकुल लाभार्थ्यांना स्वस्त दरात दर्जेदार साहित्य उपलब्ध करून देण्याबरोबरच महिलांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम संपूर्ण वसई तालुक्यात आदर्श ठरेल, अशी भावना स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.
