दृष्टी न्यूज सुधीर घाटाळ
डहाणू तालुक्यातील श्रद्धास्थान असलेल्या विवढवेढे येथील महालक्ष्मी मातेच्या यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. १२ एप्रिलपासून सुरू होणारी ही यात्रा तब्बल १५ दिवस चालणार असून, महाराष्ट्रासह विविध राज्यांतील लाखो भाविक यात सहभागी होणार आहेत. यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशासनाने व्यापक उपाययोजना आखल्या आहेत. मंगळवारी महालक्ष्मी येथे उपजिल्हाधिकारी तथा प्रांत अधिकारी सत्यम गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. या वेळी कायदा व सुव्यवस्था, भाविकांसाठी आवश्यक सुविधा आणि अन्य महत्त्वाच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली.
या बैठकीदरम्यान भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी प्रशासनाने काही महत्त्वाच्या उपाययोजना केल्या आहेत. यामध्ये यात्रेच्या ठिकाणी स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जाणार असून, टॉयलेट आणि स्वच्छतागृहांची अतिरिक्त व्यवस्था करण्यात आली आहे. कचऱ्याच्या विल्हेवाटीचे नियोजन करण्यासाठी नियमित स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. शुद्ध आणि मुबलक पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात येत आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या वाहनांसाठी नियोजित पार्किंग क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. अखंडित वीजपुरवठा कायम राहावा, यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. यात्रेच्या काळात पोलीस बंदोबस्तासह सीसीटीव्ही आणि नियंत्रण कक्षाद्वारे संपूर्ण परिसरावर नजर ठेवली जाणार आहे. यावेळी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी दुकानदारांसाठी योग्य जागा निश्चित करण्यात आली आहे.
या बैठकीत डहाणू तहसीलदार सुनील कोळी, डहाणू नगर परिषदेचे मुख्याधिकारी अक्षय गुडदे, डहाणू उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लाड, डहाणू पोलीस अधिकारी दादासाहेब घुटकुडे, गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते, कासा पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे तसेच, महालक्ष्मी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष संतोष देशमुख, शशिकांत ठाकूर, किशोर सातवी, विवढवेढे गावाचे सरपंच आणि विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
१२ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या या भव्य यात्रेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. लाखो भक्तांच्या उपस्थितीत महालक्ष्मी यात्रा यंदाही भाविकांसाठी एक भक्तिमय आणि सुखद अनुभव ठरणार आहे. यावेळी यात्रेच्या सुरळीत आयोजनासाठी भाविकांनी स्वच्छता राखावी, प्रशासनाच्या सूचना पाळाव्यात आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
