दृष्टी न्यूज प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे नुकतेच पार पडलेले अर्थसंकल्पीय अधिवेशन विविध घडामोडींनी गाजले. या अधिवेशनात 131 बोईसर (अ.ज) मतदारसंघाचे आमदार विलास तरे यांनी पालघर जिल्ह्यातील मूलभूत समस्या, आदिवासींच्या अडचणी, शेतकरी आणि कामगारांचे प्रश्न, पर्यावरणीय विषय, शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांशी निगडीत मुद्दे प्रभावीपणे विधानसभेत मांडले. विधानसभेतील अर्थसंकल्पीय अधिवेशन १५ दिवस चालले. दरम्यान आमदार तरे यांनी सर्वाधिक तारांकित प्रश्न उपस्थित करून अधिवेशनात एक वेगळी छाप पाडली असून, जनतेच्या अपेक्षा आणि अडचणी अधोरेखित केल्या.
आमदार विलास तरे यांनी एकूण ८६ तारांकित प्रश्न मांडले, त्यापैकी २२ प्रश्न चर्चेसाठी निवडले गेले. त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न केवळ लेखी उत्तरापुरते मर्यादित नसून, ते जिल्ह्यातील वास्तव समस्यांवर आधारित होते. या चर्चेत आदिवासी भागातील मूलभूत सुविधा, आरोग्य केंद्रे, शिक्षण संस्थांची कमतरता, रोजगाराच्या संधी, शेतकऱ्यांच्या बाजारपेठेची आवश्यकता आणि औद्योगिक भागातील कामगारांच्या सुरक्षिततेचे मुद्दे प्रभावीपणे मांडण्यात आले. यावर शासनाने सकारात्मक दृष्टीकोन घेत समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
अधिवेशनात आमदार तरे यांनी सर्वाधिक तारांकित प्रश्न उपस्थित करून विधीमंडळाच्या कामकाजात आघाडी घेतली. आमदार स्नेहा दुबे-पंडित – ३, आ.राजन नाईक – १३, आ.राजेंद्र गावित – १९, आ.विलास तरे – २२,आ.विनोद निकोले – २ आणि आ.हरीश्चंद्र भोये – ५ अशी यावेळी आमदारांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नांची संख्या होती.
दरम्यान आमदार तरे म्हणाले, विधीमंडळाच्या व्यासपीठाचा उपयोग करून जिल्ह्यातील समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. प्रश्न विचारणे म्हणजे केवळ औपचारिकता नाही, तर जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याची संधी आहे. अधिवेशन संपल्यानंतरही या प्रश्नांवर पाठपुरावा सुरूच राहील आणि शासनाच्या धोरणांमधून पालघर जिल्ह्याच्या विकासाला गती मिळावी यासाठी मी सातत्याने प्रयत्न करीन.आमदार तरे यांनी याआधीही विविध समस्या प्रभावीपणे विधीमंडळात मांडल्या आहेत. या अधिवेशनात मांडलेल्या विषयांवर ते संबंधित खात्यांकडे सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या ठोस भूमिकेमुळे पालघर जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल आणि स्थानिक जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
