उच्चशिक्षित व्यक्ती ‘डिजिटल अरेस्ट’ च्या नावाखाली सायबर फसवणुकीचे शिकार; जनजागृती असूनही धोका कायम
दृष्टी न्यूज प्रतिनिधी :शैलेश तांबडा
वसई : ‘डिजिटल अरेस्ट’ हा सायबर फसवणुकीचा नवीन प्रकार जनजागृतीच्या प्रयत्नांनंतरही अनेक उच्चशिक्षित व्यक्तींना फसवणुकीचा शिकार करायला लावतो आहे. वसईतील एका महिला वकिलाने याच प्रकारामुळे ५० लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. सायबर भामट्यांनी सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून, त्यांना मनी लॉंड्रींगचा गुन्हा दाखल झाल्याचे भासवले आणि ‘डिजिटल अरेस्ट’ करण्याची धमकी दिली. या प्रकरणी वसई पोलीस ठाण्यात अज्ञात भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

५२ वर्षीय महिला वकील यांना २५ मार्च २०२५ रोजी एक फोन आला, ज्यामध्ये फोनवर व्यक्तीने सीबीआय अधिकारी असल्याचे सांगितले. त्यानंतर महिला वकिलांना आधारकार्डाचा गैरवापर करून एक मोबाईल घेण्यात आला असल्याचे, आणि त्या मोबाईलवरून अश्लील संदेश पाठवले गेले असल्याचे सांगण्यात आले. तसेच दिल्लीतील एचडीएफसी बॅंकेत त्यांच्याच नावाने खाते उघडले असल्याची माहिती देण्यात आली.
व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून सीबीआय कार्यालयाचा भास निर्माण करून भामट्यांनी महिला वकिलांचा विश्वास संपादन केला आणि त्यांच्याकडून २५ मार्च ते २ एप्रिल २०२५ या कालावधीत ५० लाख ३८ हजार रुपये वेगवेगळ्या खात्यात आरटीजीएसद्वारे पाठवले. मात्र, नंतर त्यांना फसवणुकीचा संशय आला आणि त्यांनी वसई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
वसई पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३१८(४), ३(५) अन्वये अज्ञात मोबाईल धारकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
डिजिटल अरेस्ट काय आहे?
डिजिटल अरेस्ट हा सायबर फसवणुकीचा नवीन प्रकार आहे. यामध्ये सायबर भामटे स्काईप किंवा इतर प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ कॉल करून, ‘परराज्यात गुन्हा दाखल झाल्याचे’ किंवा ‘घोटाळ्याच्या चौकशीसाठी’ तुम्हाला अटक करण्यात येणार असल्याचे सांगतात. हा प्रकार लोकांच्या विश्वासाचा फायदा घेत त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी वापरला जातो.
वसईत गेल्या काही महिन्यांत डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तीन प्रमुख फसवणुकीच्या घटना घडल्या आहेत, ज्यामध्ये सायबर भामट्यांनी लाखो रुपये लुटले आहेत.
४ सप्टेबंर २०२४
वसईत राहणार्या एका आयटी तज्ञला सायबर भामट्याने बंगळूर येथील आयबी अधिकारी बोलत असल्याचे सांगितले. ५०० कोटींच्या घोटाळ्यात तुमचे नाव आले असल्याचे सांगत स्काईपवरून व्हिडियो कॉल केला. हा आयटी तज्ञ त्यांच्या जाळ्यात सापडला. यानंतर प्रकरण मिटविण्यासाठी त्यांनी त्वरीत बॅंक खात्यातून ७० लाख रुपये या भामट्यांना पाठवले. त्यानंतर म्युच्युअल फंड मध्ये गुंतवलेले ४० लाख आणि ठेवींमध्ये असलेले पैसे असे एकूण १ कोटी ४१ लाख रुपये भामट्यांना पाठवले. हा सर्व व्यवहार अवघ्या १९ दिवसात घडला.
६ सप्टेंबर २०२४ वसईत बँकेतून निवृत्त झालेला एका वृध्द महिलेला सायबर भामट्यांनी तब्बल २८ लाखांचा गंडा घातला. सायबर भामट्याने रिझर्व बँक ऑफ इंडिया मधून बोलत असल्याचे सांगितले. तुमच्या नावाने घेतलेल्या क्रेडिट कार्डचा गैरवापर झाला असून हैदराबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे सांगितले. या नंतर फिर्यादी यांना हैद्राबाद पोलिसांच्या नावाने व्हिडिओ कॉल आला आणि फिर्यादी यांना ‘डिजिटल अरेस्ट’ करत असल्याचे सांगितले. दिवसभर त्यांना व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून कॅमेऱ्यासमोर ‘अटक’ करून ठेवली. यातून मार्ग काढण्यासाठी पैशांची मागणी केली. फिर्यादी सायबर भामट्यांच्या जाळ्यात अडकल्या. तुला ४ वेळा वांद्रे येथील आपल्या बॅंकेत गेल्या आणि २८ लाख रुपये या सायबर भामट्यांना पाठवले. हा सगळा प्रकार अवघ्या १५ दिवसांच्या कालावधीत घडला.
वसई पोलिसांनी या प्रकारांमध्ये कडक कारवाई सुरू केली असून लोकांना ‘डिजिटल अरेस्ट’ सारख्या सायबर फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी जनजागृती करण्याचे आवाहन केले आहे.

बातम्या आणि जाहिरात देण्यासाठी संपर्क करा:9834756487
