दृष्टी न्यूज सुधीर घाटाळ
डहाणू तालुक्यातील महालक्ष्मी डोंगर परिसरात सोमवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. आग इतकी तीव्र होती की ती विवळवेढे गावाच्या दिशेने पसरत चारोटीकडे पोहोचली. या आगीत डोंगराचा सुमारे दोन ते तीन किलोमीटरचा परिसर भस्मसात झाला असून, मोठ्या प्रमाणावर वनसंपत्तीचं नुकसान झालं आहे.ही आग विझवण्यासाठी स्थानिक नागरिक आणि वनविभागाचे कर्मचारी यांनी संयुक्तरीत्या प्रयत्न करत तिला आटोक्यात आणलं. मात्र, आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अजून स्पष्टता नाही. नैसर्गिक वणवा की मानवी निष्काळजीपणाचा परिणाम, याचा तपास सुरू आहे.सध्या महालक्ष्मी यात्रा सुरू असल्यामुळे या भागात भाविकांची मोठी गर्दी आहे. अनेक भाविक परिसरात चुली पेटवून अन्न तयार करतात, मात्र निघताना त्या चुली विझवण्याकडे दुर्लक्ष केलं जातं. याशिवाय, बीडी-सिगारेट न विझवता फेकण्याचाही धोका असतो.

या निष्काळजीपणामुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.या आगीचा परिणाम मुंबई-अहमदाबाद महामार्गालगतही जाणवला. आग यात्रेच्या ठिकाणी पोहोचली असती, तर मोठी दुर्घटना घडली असती. मात्र, स्थानिक नागरिक आणि वनविभागाच्या सतर्कतेमुळे आग वेळीच आटोक्यात आली आणि संभाव्य मोठा अनर्थ टळला.या आधीही या परिसरात अशा प्रकारचे वणवे झाल्याची नोंद आहे. वारंवार लागणाऱ्या आगीमुळे जंगलातील जैवविविधता आणि पर्यावरणावर गंभीर परिणाम होत आहे. त्यामुळे वनविभागाने या घटनांकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे.भाविकांची वाढती उपस्थिती आणि त्यांच्या निष्काळजीपणामुळे भविष्यात आणखी धोके निर्माण होऊ शकतात. त्यामुळे प्रशासनासोबतच भाविकांनीही अधिक सजग राहणं आवश्यक आहे.

“महालक्ष्मी डोंगराला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचून प्रयत्न करत आहेत. सुमारे तासाभरात आग पूर्णपणे आटोक्यात येईल.”
सुजय कोळी, वन परिक्षेत्र अधिकारी, कासा
“आम्हाला वणवा लागल्याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही प्लॉटमध्ये जाऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही प्रमाणात जैविक नुकसान झालंच तसेच आमच्या झोपडीला आग लागली जळून खाक झाली.अशा प्रकारचे वणवे वारंवार लागतात, त्यामुळे आमच्यासारख्या प्लॉट धारकांमध्ये कायम भीतीचं वातावरण असतं.”
कृष्णा राजाराम कडू, प्लॉट धारक, चारोटी
“महालक्ष्मी डोंगराला लागलेल्या वणव्यामुळे मोठ्या प्रमाणावर वनसंपत्ती आणि स्थानिक प्लॉट धारकांचे नुकसान झाले आहे. ग्रामस्थ आणि वनविभागाने आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र जोरदार वाऱ्यामुळे ती पूर्णपणे आटोक्यात आणता आली नाही. ही घटना अत्यंत गंभीर असून यात्रेदरम्यान अशा प्रकारची आग लागणं भाविकांच्या सुरक्षेसाठीही धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे प्रशासनाने या भागात योग्य उपाययोजना करणे आणि जनजागृती करणे अत्यावश्यक आहे.”
तेजस्वी रवी कडू, सरपंच, चारोटी

