दृष्टी न्यूज सुधीर घाटाळ :9834756487
राज्यभरातील प्रसिद्ध देवस्थानांपैकी एक असलेल्या डहाणूतील महालक्ष्मी मंदिरात दरवर्षी हनुमान जयंतीनिमित्त भव्य यात्रा भरवली जाते. ही यात्रा सुमारे १५ ते २० दिवस चालते. या कालावधीत लाखो भाविक महाराष्ट्रासह इतर राज्यांमधून मातेच्या दर्शनासाठी येथे येतात.

यात्रेच्या काळात एप्रिल महिन्यातील उष्णतेमुळे डहाणू परिसरात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होते. विशेषतः महालक्ष्मी यात्रेदरम्यान मोठ्या प्रमाणात आलेल्या भाविकांनाही या पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. तसेच, या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांनाही त्यांच्या व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याची गरज भासते. मात्र स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेले हातपंप, विहिरी यांमध्ये पाणी तळाला गेले असल्याने पाण्याची मोठी अडचण निर्माण होते.

या परिस्थितीची गंभीर दखल घेत शिवसेना पालघर जिल्हा अध्यक्ष कुंदन संखे, तसेच डहाणू ग्रामीण तालुका अध्यक्ष संतोष देशमुख आणि इद्रीस सोलंकी यांनी भाविक व दुकानदारांच्या अडचणी लक्षात घेऊन स्वखर्चाने १२,००० लिटर पाण्याचा टँकर उपलब्ध करून दिला आहे.
या उपक्रमामुळे यात्रेतील भाविकांना व व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी शिवसेनेच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले आहे.
यात्रे मध्ये दिवसेंदिवस भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता, ग्रामपंचायतीकडून करण्यात आलेली पाण्याची सोय अपुरी पडत आहे. त्यामुळे यात्रेकरूंना पाण्याच्या समस्येला मोठ्या प्रमाणावर तोंड द्यावे लागत होते. ही गरज ओळखून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत पाण्याची अतिरिक्त सोय केली. या उपक्रमामुळे यात्रेकरूंना मोठा दिलासा मिळाला आहे.
संजू बोबा, दुकानदार, महालक्ष्मी
यात्रा परिसरात 13 हातपंप आणि 6 विहिरी असल्या तरी पाण्याची पातळी खालावली असल्यामुळे व वाढत्या गर्दीमुळे पाण्याची टंचाई जाणवत होती. अशा वेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या पुढाकारामुळे पाण्याची अडचण दूर झाली. भाविकांची सोय करणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, आणि हा उपक्रम खरोखरच प्रेरणादायी ठरला आहे.
नितेश भोईर, सरपंच, विवळवेढे ग्रामपंचायत

