दृष्टी न्यूज सुधीर घाटाळ
डहाणू, 19एप्रिल: सध्या पालघरमध्ये प्रसिद्ध असलेली महालक्ष्मी यात्रा सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण शासकीय यंत्रणा, विशेषतः पोलीस व प्रशासकीय कर्मचारी, यात्रेच्या सुरळीत व्यवस्थेसाठी रात्रंदिवस कार्यरत आहेत. गर्दीवर नियंत्रण ठेवणे, कोणताही अनुचित प्रकार घडू न देणे आणि भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासन सज्ज आहे.

परंतु, या काळात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) निष्काळजीपणाचे उदाहरण आज दुपारी पाहायला मिळाले. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील मनोर ते अच्छाड दरम्यानच्या रस्त्याचे काम NHAI मार्फत सुरू आहे. या कामामुळे महालक्ष्मी मंदिराकडे जाणारा एक महत्त्वाचा मार्ग बॅरीकेट लावून अर्धवट बंद करण्यात आला होता. त्याच मार्गावर कर्मचारी काम करत असल्याचे दिसून आले.
या निष्काळजी नियोजनामुळे त्या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आणि यात्रेसाठी येणाऱ्या-जाणाऱ्या भाविकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. त्यामुळे स्थानिक नागरिक, भाविक, तसेच रिक्षा युनियनचे चालक यांच्यात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्थानिकांचा असा ठाम सूर आहे की, जर हे काम सुरक्षा दृष्टीने आवश्यक होते, तर ते यात्रेच्या अगोदर पूर्ण करणे गरजेचे होते. सध्या रस्त्यावर वाहतूक अत्यंत वाढलेली आहे, अशा परिस्थितीत एक लेन बंद करणे ही अत्यंत गैरजबाबदार कृती आहे.प्रशासनाने व NHAI ने या प्रकाराची दखल घेऊन तातडीने योग्य उपाययोजना करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
