दृष्टी न्यूज सुधीर घाटाळ
डहाणू, २२ एप्रिल २०२५,डहाणू शहरात जन सुरक्षा विधेयकाविरोधात हजारोच्या संख्येने स्त्री-पुरुषांनी संतप्त मोर्चा काढत भाजप सरकारच्या हुकूमशाही धोरणाचा तीव्र निषेध केला. सागर नाका येथून निघालेल्या या मोर्चाने उन्हातान्हाची तमा न बाळगता तब्बल ५ किलोमीटरचा पल्ला पार करत डहाणू तहसील कार्यालयावर धडक दिली. या आंदोलनात ठाणे-पालघर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून मोर्चे निघाले होते.

या मोर्चात सर्वसामान्य नागरिकांपासून विविध राजकीय व सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा प्रमुख सहभाग असलेल्या या मोर्चात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, कष्टकरी संघटना हे महाविकास आघाडीचे प्रमुख घटक उपस्थित होते. त्याचप्रमाणे आदिवासी एकता परिषद, भूमी सेना, वाढवण बंदर विरोधी कृती समिती यांसारख्या संघटनांनीही जोरदार सहभाग नोंदवला.

या आंदोलनाचं नेतृत्व करत मोठ्या सभेला संबोधित करणाऱ्यांमध्ये डॉ.अशोक ढवळे, आमदार विनोद निकोले, रडका कलांगडा, लहानी दौडा, चंद्रकांत घोरखना, ब्रायन लोबो, जयेंद्र दुबळा, सुनील पऱ्हाड, भरत वायेडा, मधु धोडी, संजय पाटील, राजाराम गोलिम, उज्वला दामसे यांच्यासह विविध पक्ष-संघटनांचे अनेक नेते सहभागी होते. मोर्चात सहभागी नागरिकांनी हातात निषेध फलक घेऊन, घोषणा देत केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणांचा निषेध केला. “जन सुरक्षा नव्हे, जनता दडपशाही!”, “संविधान वाचवा – विधेयक हद्दपार करा!”, अशा घोषणांनी डहाणू शहर दणाणून गेलं.

नेत्यांनी आपल्या भाषणांतून जन सुरक्षा विधेयक हे लोकशाहीवर घाला असल्याची टीका केली. या विधेयकाच्या माध्यमातून सामान्य जनतेच्या अधिकारांवर गदा येणार असून, सरकार विरोधात आवाज उठवणाऱ्यांचा गळा दाबण्याचा हा कट असल्याचा आरोप करण्यात आला..मोर्चाच्या शेवटी तहसीलदारांमार्फत राज्यपालांना निवेदन देण्यात आले. आंदोलन शांततेत पार पडले असले तरी सहभागी नागरिकांच्या संतापातून सरकारविरोधी भावना स्पष्टपणे जाणवत होती.
बातमी आणि जाहिरात देण्यासाठी संपर्क करा -9834756487
