दृष्टी न्यूज सुधीर घाटाळ– तलासरी तालुक्यातील धामणगाव आणि करंजगाव परिसरात शनिवारी सकाळच्या सुमारास बिबट्याने दोन वेगवेगळ्या ठिकाणी महिला आणि पुरुषावर हल्ला केला. या हल्ल्यांत दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या तलासरी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनांमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
पहिली घटना सकाळी साडेआठ वाजता करंजगाव पाटीलपाडा येथे घडली. गुलाब मधुकर वरठा ही महिला चिकूच्या वाडीत काम करत असताना अचानक बिबट्याने तिच्यावर झडप घातली. तिच्या आरडा ओरड केल्याने आजूबाजूचे लोक धावून आल्याने बिबट्याने पलायन केलं.दुसरी घटना अवघ्या अर्ध्या तासात धामणगाव आपटोलपाडा येथे घडली. राज्या काकड्या चिमडा हे मिरचीच्या वाडीत काम करत असताना त्यांच्यावरही बिबट्याने हल्ला केला. या ठिकाणाहूनही बिबट्याने काही वेळात धूम ठोकली.

या घटनेनंतर वनविभाग आणि वाईल्डलाईफ विभागाने तातडीने शोधमोहीम सुरू केली असून परिसरात सापळे लावण्यात आले आहेत. नागरिकांनी गटानेच वावरावे, एकटे शेतामध्ये काम टाळावे, अशी सूचना प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

या प्रकारामुळे वन्य प्राण्यांचा मानवी वस्त्यांमधील वाढता वावर पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. पालघर जिल्ह्यात सध्या विविध मोठ्या विकास प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर जंगलतोड, कृत्रिम वणवे, उत्खनन, आणि वृक्ष तोड मोठ्याप्रमाणात सुरू आहे. परिणामी वन्य प्राण्यांच्या निवासस्थानावर घाला येत असून त्यांचा वावर मानवी वस्त्यांमध्ये वाढत चालला आहे.

या घटनांमुळे जंगल व पर्यावरण रक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, प्रशासनासमोर बिबट्याला पकडण्याबरोबरच दीर्घकालीन उपाययोजना राबवण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
बातमी किंवा जाहिरात देण्यासाठी संपर्क करा -9834756487
