दृष्टी न्यूज सुधीर घाटाळ
उन्हाळ्याच्या कडाक्यामुळे वन्य प्राणी आणि पक्ष्यांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असताना, पालघर जिल्ह्यातील मासवण परिसरातील ‘दोस्ती ग्रुप’ने एक स्तुत्य आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबवत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
मनोर-पालघर रस्त्यालगत असलेल्या वाघोबा घाट परिसरातून जाणाऱ्या पाईपलाईनमधून सतत वाया जाणारे पाणी मासवण गावात एका मोठ्या टाकीत साठवून ते जंगलातील वन्यप्राणी आणि पक्ष्यांच्या उपयोगासाठी पाणपोईच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जात आहे. या उपक्रमामुळे माकडे, राडुक्कर, हरीण, तसेच विविध पक्षी आणि इतर वन्य प्राण्यांना उन्हाळ्याच्या तीव्रतेतही पाण्याची उपलब्धता राहणार आहे.
पर्यावरण रक्षणासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न
‘दोस्ती ग्रुप’चे सदस्य मासवण आणि राजघर परिसरात यापूर्वीही विविध पर्यावरणविषयक आणि वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी उपक्रम राबवत आले आहेत. यावेळी त्यांनी जंगल परिसरात ठिकठिकाणी पाण्याच्या टाक्या व कुंड्या बसवून वन्यजीवांसाठी पाण्याची कायमस्वरूपी सोय केली आहे. विशेष म्हणजे या उपक्रमाचा लाभ केवळ प्राण्यांनाच नव्हे, तर रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या सामान्य नागरिकांनाही होतो आहे.
समूह सदस्यांचे श्रमदान या उपक्रमात प्रमोद गोवारी, भरत पागी, अनंता पवार, गणेश वावरे, विष्णु बसवत, रमेश जाधव, बालकृष्ण साबळा आणि भावेश भोईर यांचे विशेष श्रमदान लाभले. त्यांनी पाण्याच्या टाक्या उभारण्यापासून ते पाईपलाईनद्वारे पाणी आणण्याच्या कामात स्वतः पुढाकार घेऊन सहभाग नोंदवला.

वनविभागाचीही दखल ‘दोस्ती ग्रुप’च्या या कामाची दखल घेत वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत त्यांच्या प्रयत्नांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी असे उपक्रम अन्य भागातही राबवले जावेत, असे मत व्यक्त केले.

जंगलातील जैवविविधतेचे संरक्षण
या उपक्रमामुळे जंगलातील जैवविविधतेचे संरक्षण होण्यास हातभार लागणार आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याची तीव्र गरज भासणाऱ्या प्राण्यांना दिलासा मिळणार असून, मानवी हस्तक्षेपाशिवाय नैसर्गिकरीत्या वन्यजीवांचे जीवनचक्र सुरळीत राहण्यास मदत होईल.
निसर्ग संवर्धनाच्या दिशेने एक पाऊल ‘दोस्ती ग्रुप’चा हा उपक्रम केवळ पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणारा नसून, तो समाजात पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करणारा एक सकारात्मक संदेश देतो. निसर्ग संवर्धनाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल असून, इतर सामाजिक संस्थांनीही यापासून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन स्थानिक पर्यावरणप्रेमींनी केले आहे.
