दृष्टी न्यूज सुधीर घाटाळ
तलासरी तालुक्यातील धुंदलवाडी चार रस्ता ते उधवा आणि पुढे कासा या मार्गावर अवजड वाहनांची वाढती वर्दळ स्थानिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. या मार्गावरून दिवस-रात्र ट्रक, डंपर यांसारखी अवजड वाहने धावू लागल्याने ग्रामस्थ, प्रवासी आणि रोजंदारीवर जाणारा कामगार वर्ग त्रस्त झाला आहे.
उधवा ते सायवनदरम्यान रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली असून, ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. याशिवाय कासा ते संजणदरम्यान रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे वाहतुकीची स्थिती आणखीनच बिकट झाली आहे. परिणामी, प्रवासाचा कालावधी वाढत असून अपघातांची शक्यता वाढली आहे.

हळदपाडा,मोडगाव,सायवन,निंबापूर, बापूगाव, वाघाडी आणि परिसरातील नागरिक दररोज दादरा-नगर हवेलीमध्ये रोजंदारीसाठी प्रवास करतात. मात्र, रस्त्यावरील धूळप्रदूषण, खड्ड्यांमुळे होणारे अपघात आणि वेळेचा अपव्यय यामुळे त्यांच्या आरोग्यावर आणि उपजीविकेवर प्रतिकूल परिणाम होत आहे.

ग्रामस्थांनी आरोप केला आहे की, काही ट्रक चालक दापचरी चेकपोस्ट टाळण्यासाठी मुद्दाम या मार्गाचा वापर करत आहेत. त्यामुळे “या मार्गावरील वाहतूक वाढीमागे कोणाचे हितसंबंध आहेत का?” असा प्रश्न उपस्थित होत आहे.
रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे वारंवार दुरुस्ती केली जाते, मात्र काही दिवसांतच पुन्हा खड्डे पडतात. त्यामुळे या दुरुस्तीच्या कामांची शंभर टक्के पारदर्शकता आणि गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ग्रामस्थांनी संबंधित प्रशासन, आरटीओ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे लक्ष वेधून घेतले असून, त्वरित उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
मी धुंदलवाडी चार रस्ता ते उधवा या मार्गावर रिक्षा चालवतो. आम्ही रिक्षा चालक संघटनेच्या वतीने शिष्टमंडळाद्वारे प्रशासनाकडे तक्रार केली होती. त्यांनी रस्ता लवकरच होईल असे आश्वासन दिले, पण अजून काहीच झालेले नाही. रस्त्याची क्षमता ओलांडणारी अवजड वाहने येथे धावत आहेत, त्यामुळे रस्ता दिवसेंदिवस खराब होत आहे. आम्ही रिक्षा चालवत असताना आमच्यावर आरोग्यावर परिणाम होत आहे. प्रशासनाने जबाबदारीने लक्ष देऊन आमच्या अडचणी सोडवाव्यात. अन्यथा आम्ही सर्व रिक्षा चालक मिळून आंदोलन करू.
सुरेश भुरभुरे, रिक्षा चालक, मोडगाव
