दृष्टी न्यूज सुधीर घाटाळ
शिरोशी (ता. जव्हार, जि. पालघर) :जिल्ह्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार मा. मनोज कमा कामडी यांची ‘मशाल गौरव पुरस्कार २०२५’ मध्ये ‘आदर्श युवा कार्यकर्ता’ या मानाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार त्यांना त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रदान करण्यात येत आहे.

‘मशाल’ हे पालघर जिल्ह्यातील विश्वासार्ह आणि लोकप्रिय स्थानिक वृत्तपत्र असून, गेली ३१ वर्षे विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्याची गौरवशाली परंपरा राखली आहे. याच परंपरेचा एक भाग म्हणून, यावर्षीच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने गुरुवार, दिनांक ८ मे २०२५ रोजी संध्याकाळी ७ वाजता शरद नगर, वाडा येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मनोज कामडी यांना स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ आणि पुष्पहार देऊन गौरविण्यात येणार आहे.

कामडी यांनी ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरण, आदिवासी हक्क, युवकांच्या सक्षमीकरणासाठीचे प्रयत्न तसेच निर्भीड पत्रकारिता या क्षेत्रांत मोठे योगदान दिले आहे. त्यांनी त्यांच्या कार्यातून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न केला असून, त्यांचे कार्य आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
या पुरस्कारामुळे संपूर्ण पालघर जिल्ह्यातून मनोज कामडी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांचे सहकारी, विविध सामाजिक संस्था आणि स्थानिक नागरिकांनी त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
