दृष्टी न्यूज प्रतिनीधी शैलेश तांबडा
कासा, ता. डहाणू :२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात २८ निरपराध पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा समावेश होता. या अमानुष घटनेने संपूर्ण देश हळहळला असून, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी देशभरातून होत आहे.

या पार्श्वभूमीवर, रविवारी दिनांक ४ मे २०२५ रोजी सायंकाळी कासा-चारोटी परिसरातील नागरिक, श्रीराम समिती, सकल हिंदू समाज आणि नवतरुण मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने कॅंडल मार्चचे आयोजन करण्यात आले.

शिव मंदिर, कासा येथून सुरु झालेला कॅंडल मार्च मुख्य रस्त्याने सायवन नाका, बिरसा मुंडा चौकापर्यंत काढण्यात आला. यावेळी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला.मार्चदरम्यान देशभक्तिपर घोषणांनी परिसर दुमदुमला. कार्यक्रमात अॅड. आशिष चव्हाण यांनी दहशतवादी संघटना आणि पाकिस्तानचा निषेध करत, देशविघातक कृत्यांना पाठबळ देणाऱ्यांचा तीव्र शब्दांत समाचार घेतला.या श्रद्धांजली कार्यक्रमात कासा-चारोटी परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. एकात्मतेचा आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश देत हा कार्यक्रम शांततेत पार पडला.
