दृष्टी न्यूज प्रतिनिधी शैलेश तांबडा
डहाणू, 5 मे 2025 – जामशेत गोरवाडी कामडीपाडा येथील ग्रामस्थांना अखेर तीन महिन्यांच्या अंधारातून दिलासा मिळाला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून कट झालेलं लाईट कनेक्शन पुन्हा सुरू करण्यात आले असून, हे शक्य झाले आहे डहाणूचे आमदार कॉ. विनोद निकोले यांच्या तत्पर हस्तक्षेपामुळे.

ग्रामस्थांनी 2 मे रोजी आमदार निकोले यांच्याकडे थेट तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत त्यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि तीन दिवसांतच कामाला सुरुवात झाली.5 मे रोजी महावितरणचे अधिकारी श्री. गणेश दंडगव्हाळ यांनी गावात येऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. आमदार निकोले यांच्या सूचनेनुसार, तात्काळ 40 नवीन मीटर बसवण्याचे काम हाती घेण्यात आले. यासोबतच दोन नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्याची घोषणा झाली असून, जीर्ण झालेले वीज खांब देखील बदलले जाणार आहेत.

आजच संध्याकाळपर्यंत वीज पुरवठा पूर्ववत केला जाईल आणि पुढील सात दिवसांत संपूर्ण काम पूर्ण करण्याचे आश्वासन महावितरणकडून देण्यात आले आहे.या वेळी डहाणू तालुका सेक्रेटरी कॉ. रडका कलंगडा, किसान सभेचे कार्याध्यक्ष व ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष कॉ. चंद्रकांत घोरखाना, जनवादी महिला संघटनेच्या सेक्रेटरी लहानी दौडा, गावचे सरपंच कॉ. विकास दौडा, M.S.E.B चे अधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामस्थांच्या दीर्घकालीन समस्येवर तात्काळ उपाययोजना झाल्याने ग्रामस्थांत समाधान व आमदार निकोले यांच्या कार्यपद्धतीबद्दल विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.
