दृष्टी न्यूज प्रतिनिधी – शैलेश तांबडा
पालघर, ६ मे २०२५ : पालघर जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी आलेल्या वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये ७६७ घरांचे नुकसान झाले आहे. डहाणू तालुक्यातील मच्छीमार बांधवांना विशेष फटका बसला असून सुमारे ५० मच्छीमारी बोटी उद्ध्वस्त झाल्या आहेत.

तालुकानिहाय नुकसानीचा आढावा:
डहाणू – २३० घरे व ५० मच्छीमारी बोटींचे नुकसान
वाडा – ९२ घरे
विक्रमगड – ९२ घरे
जव्हार – ८९ घरे
मोखाडा – ८७ घरे
पालघर – ८५ घरे
तलासरी – ६३ घरे
वसई – २९ घरे
धाकटी डहाणू परिसरात भीषण परिणाम
डहाणू तालुक्यातील धाकटी डहाणू भागात ४० ते ५० मच्छीमारी बोटींचे आणि १० ते १२ घरांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अहवालातून समोर आले आहे.
प्रशासन सक्रिय
जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाधिकारी महेश सागर, उपविभागीय अधिकारी दिनेश पाटील, उपआयुक्त (मत्स्यव्यवसाय विभाग) व तहसीलदार सुनिल कोळी यांनी नुकसानग्रस्त भागाला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला.
लवकरच मदत मिळणार
“शासनामार्फत नुकसानग्रस्त नागरिकांना नियमांनुसार लवकरच मदत दिली जाईल,” अशी माहिती उपविभागीय अधिकारी महेश सागर यांनी दिली.
सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय विभाग व महसूल प्रशासनाचे संयुक्त पथक पंचनामे करत असून तात्काळ मदतीसाठी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.प्रशासनाकडून नागरिकांना घाबरून न जाता सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
