अवकाळी पावसामुळे शेकडो घरांचे नुकसान, मच्छीमार बांधवही संकटात
दृष्टी न्यूज सुधीर घाटाळ
पालघर जिल्ह्यात मंगळवार आणि बुधवार या दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेकडो घरांची पडझड, शेतीचे नुकसान, तसेच मच्छीमार बांधवांच्या उपजीविकेवरही गदा आली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) चे पालघर विधानसभेचे आमदार राजेंद्र गावित यांनी शासनाकडे विशेष पॅकेजची मागणी केली आहे.
गेल्या दोन दिवसांत वादळ, विजांचा कडकडाट आणि अचानक हवामान बदल झाल्यामुळे शेतकरी, आदिवासी, बागायतदार आणि मच्छीमार बांधवांना गंभीर आर्थिक फटका बसला आहे. दुबार भातशेती, पालेभाज्यांचे उत्पादन, विट व्यवसाय, फळबाग लागवड, यांसह मासेमारीसाठी वापरल्या जाणाऱ्या ७० ते ८० छोट्या-मोठ्या बोटींना नुकसान झाले असून, सुकविण्यासाठी ठेवलेली मासळी देखील वाऱ्याने उडून गेल्यामुळे मच्छीमार समाज हवालदिल झाला आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार राजेंद्र गावित यांनी धाकटी डहाणू परिसरातील नुकसानग्रस्त गावांचा दौरा केला. त्यांनी उर्से, गंजाड, आंबिवली, रायतळी, निकावली, दाभोण, रणकोळ यांसारख्या गावांमध्ये प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी अनेक नागरिकांची घरे दुर्घटना ग्रस्त झाली असल्याचे निदर्शनास आले असून, घरांची पत्रे उडाली असून शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे.

या दौऱ्यात आमदार गावित यांच्यासोबत तहसीलदार सुनील कोळी, मत्स्यविकास विभागाचे सहायक आयुक्त दिनेश पाटील, स्थानिक सरपंच-उपसरपंच, विविध मच्छीमार सोसायट्यांचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी तात्काळ पंचनामे करून शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. “शासनाने शासकीय निकषानुसार नुकसानग्रस्तांना मदत द्यावी आणि विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे,” अशी जोरदार मागणी त्यांनी केली.
यावेळी ग्रामीण भागातील स्थानिक कार्यकर्ते अभिजीत देसक,कौशल कमडी, संजय धेंडे, पांडुरंग डूकले, शिलिंग लहांगे, सिक्किन करमोडा यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, रणकोळ बेटांगळीपाडा येथे बाबू रामा करमोडा यांच्या घराचे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. यावेळी रणकोळ ग्रामपंचायतीच्या सरपंच वनिता करमोडा, उपसरपंच मुलचंद बोलाडा, सदस्य प्रविण गडग, उपतालुका प्रमुख शिलिंग लहांगे, संजय धिंडे आणि ग्रामस्थांनी भेट देऊन पीडित कुटुंबाला धीर दिला.तसेच रणकोळ फोपलनपाडा येथे नव्याने बसवण्यात आलेल्या ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटनही करण्यात आले. या कार्यक्रमात सरपंच वनिता करमोडा, उपसरपंच मुलचंद बोलाडा, माजी सरपंच दिलीप गडग, सदस्य प्रविण गडग, सखाराम करमोडा, नितेश ओझरे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
