प्रतिनिधी शैलेश तांबडा :वाडा तालुक्यातील शेतकऱ्यांना आदिवासी विकास महामंडळामार्फत खरेदी करण्यात आलेल्या भात उत्पादनावर देय असलेली बोनस रक्कम अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकरी अडचणीत सापडले असून, याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.शासनाने जाहीर केल्याप्रमाणे नोंदणीकृत शेतकऱ्यांना प्रती हेक्टर ₹२०,००० मदत व बोनस मिळणे आवश्यक आहे.

मात्र, ही रक्कम अद्याप त्यांच्या खात्यात जमा झालेली नसल्याने शेतकऱ्यांना बियाणे, खते व कीडनाशके खरेदी करता येत नाहीत. परिणामी पेरणी प्रक्रिया विलंबाने होत असून उत्पादनावरही परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे पालघर जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांनी वाडा तहसील कार्यालयात भेट देत तहसीलदार यांना निवेदन सादर केले. त्यांनी शासन आणि संबंधित महामंडळाकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली असून, जर बोनस रक्कम वेळेत देण्यात आली नाही तर “संपूर्ण जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्याचा” इशारा दिला आहे.या निवेदनप्रसंगी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा देत राहील, असा ठाम विश्वासही यावेळी प्रफुल्ल पाटील यांनी व्यक्त केला.

“महामंडळामार्फत शेतकऱ्यांना बोनस वेळेवर मिळणे अत्यंत आवश्यक आहे. जर यंदाही बोनस वेळेवर मिळाला नाही, तर अंदाजे पंधरा ते सोळा हजार रुपये गमावून शेतकरी आर्थिक संकटात सापडू शकतो. यामुळे जर वेळेवर निर्णय झाला नाही, तर काँग्रेस पक्ष संपूर्ण जिल्हा पातळीवर आंदोलन छेडेल.”
प्रफुल्ल पाटील, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस पालघर
बातमी किंवा जाहिरातीसाठी संपर्क करा 9834756487
