संपादक सुधीर घाटाळ
ग्रुप ग्रामपंचायत विवळवेढे (महालक्ष्मी), सोनाळे, खानिव आणि आवढाणी या डहाणू तालुक्यातील चार आदिवासीबहुल गावांतील नागरिक आजही घरकुल योजनेपासून वंचित आहेत. स्वातंत्र्यानंतर आजतागायत काही नागरिकांना स्वतःचे हक्काचे घर मिळालेले नाही, ही बाब शासनाच्या गोरगरीब आणि आदिवासी विकास धोरणांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.

या संदर्भात आदिवासी अस्मिता संघटनेचे पालघर जिल्हाध्यक्ष विलास वांगड यांनी ग्रामसेवक, उपसरपंच आणि सदस्यांवर घरकुल योजनेचा सर्व्हे न केल्याचा आणि दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. गावात घरकुल योजनेची गरज असताना संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधी वेळेवर सर्व्हे करत नाहीत. त्यामुळे वर्षानुवर्षे आदिवासी कुटुंबं उघड्यावर राहत आहेत. असे वांगड यांनी स्पष्टपणे सांगितले.

या पार्श्वभूमीवर बुधवार, दि. ४ जून २०२५ रोजी या चारही गावांतील घरकुल योजनेपासून वंचित महिला व पुरुषांनी पंचायत समिती डहाणू येथे गटविकास अधिकारी सस्ते यांच्या कार्यालयात भेट घेऊन आपली व्यथा मांडली. गावागावातील परिस्थिती, जुन्या अर्जांची प्रलंबित स्थिती, आणि नव्या सर्वेची गरज यावर सविस्तर चर्चा झाली. बैठकीत गटविकास अधिकारी यांनी संबंधित गावांमध्ये लवकरच पुन्हा एकदा घरकुल योजनेसाठी सर्वे केला जाईल, अशी ग्वाही दिली. ज्यांना खरोखर गरज आहे आणि ज्यांची नावे मागील यादीतून वगळली गेली आहेत, अशा सर्व पात्र लाभार्थ्यांना नव्याने घरकुल योजना देण्यात येईल.असे त्यांनी म्हटले आहे.

सरकारने विविध योजना जाहीर केल्या असल्या तरी त्या खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाहीत, ही वस्तुस्थिती आजही अनेक भागात पाहायला मिळते. डहाणू तालुक्यातील या चार गावांतील आदिवासींचा संघर्ष हेच दर्शवतो की, योजनांची अंमलबजावणी ही केवळ कागदोपत्री न राहता, जमिनीवर व्हावी यासाठी लोकांनीच पुढाकार घ्यावा लागतो. आता प्रशासनाच्या आश्वासनानंतर या गावातील गरीब कुटुंबांना खरोखर घर मिळेल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
बातमी आणि जाहिरात देण्यासाठी संपर्क करा 9834756487
